Tuesday, 20 December 2016

शाळेनंतरचे माझे पहिले वहिले भाषण!!

सर्व माननीय शिक्षक, संस्थेचे अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी यांना मनःपूर्वक नमस्कार ! आज इथे येताना खूप आनंद झालाय मला. कारण हा माझ्या आयुष्यातला दुसरा सेंड ऑफ आहे. जवळपास बावीस वर्षांपूर्वी म्हणजे १७ फेब्रुवारी १९९४ ला माझा सेंड ऑफ झाला होता. इतकी वर्षे होऊन गेली पण अजूनही मला तो दिवस आठवतोय. अगदी काळ परवाची गोष्ट असल्यासारखा. कारण तो दिवसच स्पेशल असतो. मनात असंख्य भावना दाटून आलेल्या असतात. थोडं परीक्षेचं टेन्शन असतं. थोडी कॉलेज लाईफची उत्सुकता! तर थोडं दुःखही असतं. आपली शाळा, आपले शिक्षक मित्रमैत्रिणींपासून दुरावण्याचं. आयुष्यातला एक अध्याय संपत असतो आणि नव्याची चाहूल लागत असते.

आयुष्य!! एखाद्या चित्राप्रमाणे असतं हे आयुष्य! आपण चित्र काढायला घेतो. एका कोऱ्या कागदावर पेन्सिलने चित्र रेखाटतो. उभ्या आडव्या वक्र अशा वेगवेगळ्या रेषांनी एक सुंदर चित्र बनते. आणि चित्र रेखाटल्यावर त्यात रंग भरायला सुरुवात करतो. रंग भरताना त्या रेषांनी बनवलेल्या चौकटींचे भान ठेवावं लागतं. रंग कोणतेही असू द्या, शेडींग कसंही करा पण त्या रेषांमध्ये जर रंग सिमित केले नाही तर त्या चित्राची शोभाच निघून जाते. तसंच आयुष्याचं  आहे. आपण शाळेत जातो तेव्हा आपल्या मनाचा कॅनव्हास असाच कोरा असतो. त्यावर आपले शिक्षक आपला हात धरून ज्ञानाचे, संस्कारांचे चित्र रेखाटतात. अन शालेय शिक्षण जेव्हा पूर्ण होते तेव्हा ते चित्र रेखाटून झालेले असते. त्या नंतरच्या आयुष्यात आपण आपल्या आवडीप्रमाणे त्यात रंग भरत जातो. रंग भरताना आपण जर त्या रेघांचे, संस्कारांचे भान ठेवले तर आपलं आयुष्य एका सुंदर कलाकृतीप्रमाणे बहरून येते. तेव्हा आयुष्यात पुढे जे काही कराल त्यात या रेघांचे भान नेहमी लक्षात असू द्या तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.

यशस्वी कोणाला नसतं  व्हायचं? प्रत्येकजण म्हणत असतो मला हे व्हायचंय.. मला ते व्हायचंय. आणि म्हणूनच मी आज तुम्हाला यशस्वी होण्याचा फॉर्म्युला सांगणार आहे. तो फॉर्म्युला  आहे 

C x C x D = Success

तुम्ही म्हणाल आता हे काय आहे नवीनच? सांगतो.
पहिला C म्हणजे Concentration!! एकाग्रता !!
यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं  ते ध्येय आणि त्यावर असलेली एकाग्रता. तुम्ही नववीत शिकलाच आहात कि सुरीने जर आपल्याला नीट कापायचं असेल तर तिला नीट धार असली पाहिजे. खिळा जर टोकदार असेल तर तो भिंतीत सहज घुसतो अन जर टोक नसेल तर तो वाकतो, तुटतो. तसेच जर आपण कापूस सूर्यप्रकाशाखाली धरला तर त्याला काही होत नाही पण जर मध्ये भिंग धरले तर प्रकाशकिरण एकत्रित होऊन कापूस जळून जातो. हे सगळे कशामुळे घडते? तर त्या त्या शक्तींच्या एकाग्रतेमुळे!! तशीच एकाग्रता आपल्याला स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. जर आपण आपली इच्छाशक्ती, आपले प्रयत्न त्या खिळ्यासारखे तीक्ष्ण केले तर यशाची पहिली पायरी आपण चढू शकतो.

आता दुसरी पायरी काय आहे ते बघूया. दुसरा C म्हणजे Confidence!! आत्मविश्वास!! मघापासून मी तुमची भाषणं,  तुमची मनोगतं ऐकली. तुमचा सर्वांसमोर बोलतानाचा आत्मविश्वास खूपच उत्कृष्ठ आहे. तसाच आत्मविश्वास आपल्या ध्येयाच्या बाबतीत ठेवायचा. तर आत्मविश्वास कसा कमवायचा? आत्मविश्वास हा brain programming पासून बनतो. कसा? त्यासाठी आपण आधी विश्वास म्हणजे काय ते बघू. आपल्याला डॉक्टरवर 'ते आपल्याला बरं करतील' असा विश्वास असतो. शिक्षक आपल्याला चांगलंच शिकवतात याची आपल्याला खात्री असते तसेच पेपरमधील बातमी आपल्याला whatsapp वरील बातमीपेक्षा विश्वसनीय वाटते. का बरं? कारण आपलं Brain programming तसं घडलंय. किंवा घडवलंय म्हणा ना.  
ब्रेन प्रोग्रॅमिंग समजण्यासाठी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक सर्कसवाला जंगलातून एक हत्तीचं पिल्लू पकडून आणतो. त्याला एका जाडजूड साखळीने पायाला बांधून ठेवतो. साहजिकच ते पिल्लू सुटायचा खूप प्रयत्न करते. पाय ओढून ओढून साखळी तोडायचा प्रयत्न करते. दोन दिवस जातात. चार दिवस जातात. त्याच्या पायातून रक्त येऊ लागते पण साखळी काही केल्या तुटत नाही. हळूहळू ते पिल्लू प्रयत्न सोडून देते. कालांतराने तो हत्ती मोठा होतो. आता मालक त्याला फक्त जाड रश्शीने बांधून ठेवत असतो. आता तो हत्ती ती रश्शी एका फटक्यात तोडू शकतो एवढी ताकद त्यात आलेली असते. पण तो तसं  करत नाही. कारण negative brain programming!! त्याला असं वाटत असतं  कि तो कधीच सुटू शकत नाही. आपलंही तसंच आहे. बरेचदा आपण असंच negative brain programming करून घेतो. 'हा विषय मला येत नाही' 'मला हे जमत नाही ते जमत नाही' 'गणित येत नाही' 'भाषण येत नाही' हि सर्व negative brain programming ची उदाहरणं. त्यामुळेच आपला आत्मविश्वास डळमळतो. म्हणून आपण आपल्या मनाला positive विचार करायला शिकवलं पाहिजे. नकारार्थी विचार काढून टाकले पाहिजेत. जे येत नाही ते परत परत करून बघितले पाहिजे. त्यापासून पळून काय फायदा? काय होईल जास्तीत जास्त? दोन चार वेळा आपण चुकू. पण शेवटी यश नक्कीच मिळेल एकदा हे जमले कि आपला आत्मविश्वास द्विगुणित होईल यात शंका नाही.


आता तिसरी पायरी. D फॉर Determination!! जिद्द !! अजून एक गोष्ट सांगतो. अगदी खरीखुरी. एक माणूस होता. त्याचं नाव जीन डोमिनिक बॉबी. एकदा त्याला stroke /पक्षाघात झाला आणि तो कोमात गेला. वीस दिवसांनी जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो पूर्ण paralyse झाला होता. त्याचे हात पाय तो हलवू शकत नव्हता, उठू शकत नव्हता, बोलू शकत नव्हता. तो त्याच्या शरीराची फक्त डाव्या डोळ्याच्या उघडझाप करू शकत होता. आता मला सांगा. असा माणूस काही करू शकेल का? पण त्याने हार मानली नाही. त्याच्या डोक्यात प्रचंड विचार चालू होते. पण तो कोणाला सांगूही शकत नव्हता आणि लिहूही शकत नव्हता. मग त्याने एक विलक्षण सुरुवात केली. त्याने त्याच्या असिस्टंट सोबत संवाद सुरु केला. कसा ? त्याची असिस्टंट त्याला सर्व मुळाक्षरे सांगायची. त्यातलं योग्य अक्षर आलं कि तो डाव्या डोळ्याची पापणी मिटायचा. मग पुढचं अक्षर!! परत ती सर्व मुळाक्षरे सांगायची. असं करत करत अक्षरांमागून अक्षर सांगून शब्द बनले. शब्दांची वाक्ये बनली. आणि हळूहळू त्या माणसाने चक्क अख्ख पुस्तकच लिहिलं!! त्या पुस्तकाचं नाव "The Diving Bell and the Butterfly". जेव्हा ते पुस्तक बाजारात आलं तेव्हा त्याच्या हजारो लाखो प्रति विकल्या गेल्या. याला म्हणतात जिद्द!! जर एक असा माणूस, ज्याला काहीही करणे अशक्य आहे, तो चक्क पुस्तक लिहू शकतो तर विचार करा, जिद्द बाळगल्यास तुम्ही काय काय करू शकाल? बस्स फक्त हि त्रिसूत्री लक्षात ठेवा. Concentration! confidence! and Determination! हि दहावीचं काय पण आयुष्यातील कोणत्याही परीक्षेत तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. तुम्हाला त्यासाठी माझ्याकडून Best of Luck!!

Monday, 23 May 2016

तीन तेरा

तीन तेरा

'बस्स. हे शेवटचं डिझाईन झालं कि संपलं .' अजय स्वतःशीच बोलत होता. आज शुक्रवार असल्यामुळे त्याला काम आजच संपवायचं  होतं. उगाच विकएंडला मानगुटीवर कामाचं भूत कशाला?
ट्रिंग ट्रिंगतेवढ्यात डेस्कवरचा फोन खणखणला.
"आता कोण तडमडलं?" तो पुटपुटला.
"हॅलो. . मिस्टर अजय जागुष्टे आहेत का?"
"बोलतोय. आपण ? "
"मी श्वेता. विशालची बायको." समोरून उत्तर आलं.
"अं . . बोला ना. काय काम आहे? " कॉल अनपेक्षित होता.
"मला विशालने तुमच्याकडून आमचं मॅरेज सर्टिफिकेट घ्यायला सांगितलंय. आज जमेल का भेटायला ?"
"अच्छा अच्छाचार पाच महिन्यांपूर्वी विशाल म्हणाला होता मला. पण त्यानंतर त्याचाही फोन नाही आला आणि तुम्हीही नाही आलात. ठीकाय. जमेल मला आज. कुठे भेटायचं?"
"तुम्ही सांगा" ती म्हणाली.
"एक काम करा. स्टेशन जवळ 'शिवप्रसाद' आहेना तिथे भेटा. माझं घर जवळच आहे तिथून. मी सर्टिफिकेट घेऊन सात सव्वासात पर्यंत येईन. जमेल तुम्हाला? "
"हो. जमेल. थॅंक यु हां"
काम आटपून त्याने स्टेशनला जायला रिक्षा पकडली.  वाऱ्याबरोबर त्याच्या मनात आठवणी घोंघावू लागल्या .  


विशाल. . अजयचा मित्र. एकदम मस्त व्यक्तिमत्व. व्यायामाने कमावलेलं शरीर, उंच बांधा आणि बोलायला  स्मार्ट. दोघंही एकाच कंपनीत काम करायचे. विशाल मार्केटिंग एक्झिक्युटिव तर अजय डिझाईन मॅनेजर. दोघंही लंचला एकत्रच बसायचे. असंच एकदा लंच टाईमला विशालने त्याची लव्हस्टोरी सांगितली होती अजयला. त्याची आणि श्वेताची लव्हस्टोरी!! श्वेता  एक अनाथ मुलगी. मुंबईतल्या अनाथाश्रमात वाढलेली. एकदम स्वाभिमानी. शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागल्यावर तिने भाड्याने घर घेतले तिकडे राहू लागली. हे घर विशालच्या घराजवळच होतं. तिथेच त्यांच्या प्रेमाचा अंकुर रुजला.
एकदा विशाल जरा उशिरा ऑफिसला आला. आपल्या हातातील कागद पुढं करत अजयला म्हणाला "हे बघ."
अजय आश्चर्याने उडालाच. "मॅरेज सर्टिफिकेट!!"
"येस्स.. आम्ही लग्न केलं रजिस्टर पद्धतीने." इति विशाल.
"अरे पण एवढं घाईत? आम्हाला सांगितलं पण नाहीस"
"आमच्या घरातले कसे आहेत माहितीयेना. ते मुळीच परवानगी देणार नाहीत या लग्नाला. म्हणून  . . "
"म्हणजे तुझ्या घरच्यांनाही माहित नाहीये. अरे देवा." अजय म्हणाला.
"सांगितलं असतं  तर त्यांनी मला लग्नच करू नसतं दिलं. मला emotionally blackmail केलं असतं. आता मात्र लग्न झालंय. लवकरच सांगू त्यांना. तो पर्यंत ती तिच्याच घरी राहणार आहे. फक्त एक काम कर माझं. हे सर्टिफिकेट तुझ्याकडे ठेव. जर घरी ठेवलं आणि कोणी बघितलं तर काही खरं नाही."
अजय ते सर्टिफिकेट ठेवत म्हणाला " ठीकाय. पण लवकर सांग घरी "
महिन्याभराने विशालने घरी सांगितलं आणि महाभारत घडलं. एक तर प्रेमविवाह, तोही रजिस्टर पद्धतीने आणि तो एका अनाथ मुलीबरोबर म्हणजे हुंडाबिंडा घेता. त्याच्या आईने तर आकांडतांडव केलं. श्वेताला तर घरातच घेतलं नाही. शेवटी एक दिवस संधी साधून दोघं पळून गेले. आईवडिलांचा नाही तर देवाचा तरी आशीर्वाद मिळावा म्हणून मग गणपती मंदिरात दोन-चार मित्रांच्या आणि ब्राह्मणांच्या साक्षीने त्यांनी पुन्हा लग्न केलं  आणि संसार मांडलाइकडे विशालच्या आईवडिलांची परिस्थिती फार वाईट झाली होती. एकुलता एक मुलगा घर सोडून गेल्याने  मानसिक त्रास तर होत होताच पण आर्थिक चणचणसुद्धा भासत होती. शेवटी त्यांनी माघार घेतली. आतापर्यंत सर्व झालेल्या चुकांची भरपाई म्हणून कि काय पण दोघांना घरी आणून पुन्हा एकदा थाटात त्यांचं लग्न लावून दिलं. अशा पद्धतीने या दोघांची तीन चार महिन्यांमध्ये तीन लग्ने झाली आणि त्यांच्या संसाराची गाडी रुळावर आली. थोड्याच दिवसात विशालला दुसरी चांगली नोकरी मिळाली. या सर्व गडबडीत ते सर्टिफिकेट अजयकडेच  राहून गेलं होतं. विचार करताकरता अजयची रिक्षा स्टेशनला पोचली.



अजय हॉटेल मध्ये पोचला. ती समोरच्याच खिडकीजवळ बसली होती. अजयला पाहताच हसली.
"सॉरी. थोडा उशीर झाला मला" अजय टेबलाजवळ येत म्हणाला.
"नाही नाही. ठीक आहे" ती.
अजय समोर बसला. तिच्या नजरेतली पूर्वीची चमक थोडी कमी झाल्यासारखी वाटली त्याला. डोळे खूप खोल गेले होते. खूप थकलेली वाटत होती ती.
अजयने दोन कॉफी ऑर्डर केल्या. "जवळ जवळ आठ महिन्यांनी भेटतोय आपण. कसं चाललंय. विशाल कसाय? अलीकडे फोनच करत नाही तो?"
ती कसबसं हसली अन म्हणाली "मजेत चाललंय. अलीकडे खूप उशीर होतो ऑफिसमधून यायला विशालला. म्हणून नसेल केला फोन. तुम्ही सर्टिफिकेट आणलं का?"
"हो. एक मिनिट हं ." अजयने पिशवीतून सर्टिफिकेट काढले. "हां . हे घ्या "
पर्समध्ये सर्टिफिकेट ठेवताना इतकावेळ ओढणी खाली लपलेल्या हातांवरच्या जखमा अजयच्या तीक्ष्ण नजरेतून सुटू शकल्या नाहीत.
"काय झालंय? काही प्रोब्लेम आहे का ?  " अजयने  विचारले
" काही नाही"
अजय प्रेमळ स्वरात म्हणाला " हे बघा. तुम्ही मला बहिणीसारख्या आहात. मला वाटतंय कि काहीतरी प्रॉब्लेम आहे. मला सांगितलं तर मी नक्की मदत करीन. विश्वास ठेवा"
आणि इतका वेळ मनावर घातलेला तिचा बांध फुटला. "काय सांगू तुम्हाला. संपलंय हो सगळं" तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
"अहो अश्या धीर गमावू नका. काय झालंय? नीट  सांगा पाहू"
श्वेताने हुंदके आवरत म्हणाली "लग्नानंतर आम्ही विशालच्या आईबाबांबरोबर रहायला लागलो. एक-दोन महिने छान गेले. आपण खूप बदललोय असं दाखवून विशालच्या आईबाबांनी विशालचं मन जिंकलं. पण हळूहळू आईंनी विशालचे कान भरायला सुरुवात केली."
"म्हणजे?"
"आईंनी विशालला माझ्या नकळत सांगितलं  कि मी त्यांना त्रास देते, वेळेवर जेवायला देत नाही, चुकीची औषधे देते, उलटं  बोलते आणि बरंच काही. पण खरं सांगते हो, मी असं काहीच केलं नाहीये. मी आईंना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना हुंडा देणारीच सून हवी होती. त्यामुळे विशालच्या मनात त्यांनी माझ्याविषयी एवढं विष कालवलय  कि तो माझ्याशी धड बोलतही नाही. काल तर त्याने माझ्यावर हात " श्वेता अचानक गप्प झाली.
"काय बोलताय काय तुम्ही वहिनी?"
"अहो विशालला एक-एक गोष्टी खोट्या पुराव्यांसकट दाखवल्या आहेत आईंनी. आणि विशालनेसुद्धा माझ्यावर विश्वास नाही ठेवला. आता तर घरात घटस्फोटाचे विषय चालू झालेत"
"वहिनी. तुम्ही काही काळजी करू नका. मी बोलेन त्याच्याशी. पण मला सांगा तुम्ही या सर्टिफिकेटचं काय करणार आहात? काय ठरवलंय तुम्ही"        
काही माहित नाही. ठरवलं  नाहीये. पण फार सहन नाही करणार आता. कदाचित पोलिसांकडे जाईन. कदाचित वकिलाकडे. पण त्यासाठी हे सर्टिफिकेट लागेल म्हणून तुम्हाला भेटायला आले"
"वहिनी. घाई करू नका. एक दोन दिवस वाट बघा. मी उद्याच बोलतो त्याच्याशी."
"ठीक आहे. बघा जमतंय तर. चला निघते मी. उशीर झालाय. घरी जायच्या आधी मला जिमखान्यात थोडं काम आहे. "
अजय घरी परतला. रात्रभर अजयचा डोळ्याला डोळा लागला नाही. हे सर्व त्याच्या कल्पने पलीकडचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याने विशालला फोन लावला.
"हॅलो. विशाल, मी अजय "
"हाय अजय. वेळेवर फोन केलास. अरे श्वेता काल बाहेर गेली ती अजून परत आली नाहीये" विशाल टेन्शनमध्ये म्हणाला.
"काय? अरे ती तर.. कुठे आहेस तू ? डोंबिवली स्टेशनला ये. आपण बघू या" अजय तातडीने डोंबिवलीला निघाला. काय झाले असेल? काही अपघात तर ? कि जीवाचं बरं वाईट तर . . अजयचा मेंदू विचाराने पोखरून निघाला.
दोघं भेटले. "अरे काल पासून ती घरी आली नाहीरे. सगळे काळजीत आहेत" विशाल म्हणाला
अजय " हे बघ धीर धर. ती मला काल भेटली होती."
"काय?" विशाल चमकलाच.
"हो. तिने मला सर्व सांगितलंय. एक काम करूया आधी जिमखान्यात जाऊया. निघताना ती म्हणाली होती कि ती जिमखान्यात जाणार आहे म्हणून"
दोघेही तडक जिमखान्यात गेले. चौकशी केल्यावर समजलं कि ती तिथे आली होती आणि लॉकर उघडला होता. डुप्लीकेट चावीने मॅनेजरने लॉकरचा दरवाजा उघडला.
त्यात एक पत्र होतं. विशालने घाईघाईत पत्र घेतलं.  भराभरा वाचलं. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पत्र अजयच्या हातात देत विशाल मटकन कोसळला. पत्रात लिहिलं होतं



"प्रिय विशाल,
मी जातेय. तुझ्या आयुष्यातून खूप दूर.. कायमची.. गेल्या तेरा महिन्यात आपण तीन लग्ने केली पण तरीही आपण एकरूप होऊ शकलो नाही. आज ना उद्या आपला घटस्फोट होणारच होता. पण त्यात माझं  नुकसान होतं. मला आयुष्यभर तुझी घटस्फोटिता म्हणून राहावं लागलं असतं. माझ्यावर विश्वास न ठेवणाऱ्या, माझ्या भावनांना न समजणाऱ्या माणसाची घटस्फोटिता म्हणून मला रहायचं नव्हतं. 
म्हणून मी ठरवलं आपल्या लग्नाचे सर्व पुरावे नष्ट करायचे. मग मी लग्नाचा अल्बम, मॅरेज सर्टिफिकेट सर्व काही नष्ट केले. यापुढे आयुष्यभर मी  अविवाहिता रहायचं ठरवलंय. सर्व आठवणी मनातून पुसून टाकणार आहे मी. आज पासून मी नव्या आयुष्याला सुरुवात करतेय. कृपया मला शोधू नकोस.
कधीच तुझी नसलेली,


श्वेता "